उसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी उसाला संतुलित खताचा पुरवठा करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी उसाचे एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. एकात्मिक पद्धतीने खताचा पुरवठा करत असताना खालील प्रकारे खताच्या मात्रा व खते दिल्यास उत्पादनात वाढ होईल. जमिनीची व पिकाची अन्नद्रव्याची गरज रासायनिक, सेंद्रिय अथवा जिवाणूजन्य खते यांच्या एकत्रित वापरातूनच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. अडसाली उसासाठी किमान तीन वर्षांतून एकदा तरी शेणखत अथवा कंपोस्टखत देण्याची शिफारस असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक कमी-जास्त होत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटले आहे. परिणामी, जमिनीमधील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या घटली आहे. अशा सर्व घटकांचा परिणाम ऊस उत्पादकतेवर झाला आहे. हे टाळण्यासाठी मातीपरीक्षण करून, सेंद्रिय, रासायनिक व जिवाणू खतांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात वापर करण्याची आवश्यकता आहे.
खते देण्याची वेळ महत्त्वाची
1) उसाची उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज कमी असते, तर उगवण, मुळांची वाढ व फुटव्यासाठी स्फुरद व पालाशची गरज जास्त असते.
2) ऊस लागण करताना एकूण शिफारशीत खतमात्रेपैकी 10 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद व 50 टक्के पालाश देणे फायद्याचे ठरते. फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी नत्राची गरज जास्त असते, म्हणून सहा ते आठ आठवड्यांनी 40 टक्के नत्राची मात्रा द्यावी. जोमदार वाढीच्या अवस्थेच्या वेळी सर्वच अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळी 40 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद व 50 टक्के पालाशची खतमात्रा द्यावी. मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही.
3) गंधकाचा वापर - गंधक हे जरी दुय्यम मूलद्रव्य असले तरी उसासाठी त्याचा वापर महत्त्वाचा आहे. लागणीच्या वेळी एकरी 24 किलो मूलद्रव्यी गंधक शेणखतात मिसळून द्यावे. चुनखडीयुक्त विम्ल जमिनीत मूलद्रव्यी गंधक वापरावा, तर हलक्या प्रतीच्या आणि कमी चुनखडीच्या जमिनीत फॉस्फोजिप्सम किंवा कारखान्यातील प्रेसमड केकचा वापर करावा.
4) सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर - उसासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्याचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे आहे. माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास लागणीच्या वेळी देण्यात येणाऱ्या खतांच्या मात्रांबरोबर प्रतिएकरी फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट आठ किलो, मॅंगेनीज सल्फेट 10 किलो व बोरॅक्स दोन किलो शेणखतात मिसळून द्यावे.
5) उसासाठी सिलिकॉनचा वापर - जमिनीत सिलिकॉनचे प्रमाण जरी जास्त असले तरी बहुतांशी रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. सिलिकॉनची मोनोसिलिसिक आम्ल स्वरूपातील संयुगे क्रियाशील असतात आणि याच स्वरूपात पिकाकडून शोषण होते. शोषण केलेले मोनोसिलिसिक आम्ल पिकाच्या पेशीद्रव्यात सिलिका जेल स्वरूपात साठविले जाते. त्यामुळे पेशी कवच कठीण बनते. पानांतून पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन अवर्षण परिस्थितीत पानांत पाणी टिकून राहते. रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वाढ होते, जमिनीत स्फुरदाची उपलब्धता वाढते. परिणामी ऊस आणि साखर उत्पादनात चांगली वाढ होते. यासाठी महाराष्ट्रातील मध्यम खोल काळ्या जमिनीत उसाच्या लागण आणि सलग दोन खोडव्यांचे अधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी एकरी 160 किलो सिलिकॉन बगॅसची राख किंवा कॅल्शिअम सिलिकेट शेणखतात मिसळून ऊस लागणीच्या वेळेस एकदाच देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
खते देताना घ्यावयाची काळजी
सध्या आपण ज्या पद्धतीने रासायनिक खते देतो, त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र 25 ते 30 टक्के, स्फुरद 15 ते 20 टक्के व पालाश 50 ते 60 टक्के पिकास उपलब्ध होतात. हे लक्षात घेता रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
1) खते जमिनीवर पसरून न देता ती मातीत मिसळण्यासाठी चळी घेऊन किंवा खत पेरणी अवजाराच्या साह्याने द्यावीत.
2) युरिया खत देताना निंबोळी पेंडीबरोबर 6 - 1 या प्रमाणात मिसळून द्यावीत.
3) हलक्या प्रतीच्या जमिनीत युरियाचा वापर जास्तीत जास्त वेळा विभागून करावा.
4) जमिनीमध्ये वाफसा असताना खते द्यावीत. जमीन कोरडी असल्यास किंवा पाणी दिल्यानंतर लगेच खते देऊ नयेत.
5) ऊस लागणीअगोदर बेणेप्रक्रिया - एक लिटर ऍसिटोबॅक्टर डायझोट्रॉफिक्स हे जिवाणू खत प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेणे 10 मिनिटे बुडवून ठेवावे किंवा लागणीनंतर 60 दिवसांनी उसाच्या पानांवर फवारणी केल्यास शिफारशीत नत्र खतमात्रेत 50 टक्के बचत होते.
6) स्फुरदयुक्त खते शेणखतात मिसळून मुळांच्या सान्निध्यात येतील अशा पद्धतीने द्यावीत. जमिनीत स्फुरदाची अविद्राव्य संयुगे तयार होतात आणि स्फुरद पिकास उपलब्ध होत नाही. सेंद्रिय खतातील सेंद्रिय आम्लामुळे स्फुरदाची अविद्राव्य संयुगे विरघळतात. एकरी एक लिटर स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खत प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून वाफसा स्थितीत जमिनीत आळवणी केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते. शिफारशीत स्फुरद खतमात्रेत 25 टक्के बचत करता येते.
7) हिरवळीचे पीक घेऊन ऊस लागण करावयाची असल्यास उसासाठीचा स्फुरद खताच्या पहिल्या हप्त्यापैकी 50 टक्के हिरवळीच्या पिकास द्यावा. उरलेला 50 टक्के ऊस लागणीच्या वेळी सरीमध्ये द्यावा.
8) पाण्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोटॅश या खताची मात्रा एकरी 50 किलो वाढवून द्यावी.
9) शिफारशीप्रमाणे एकरी 24 किलो गंधकाचा वापर केला असता स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही उपलब्धता वाढते.
10) पालाशयुक्त खते पाण्याच्या निचऱ्यावाटे वाहून जाण्याचा धोका कमी असतो. ही खतेदेखील सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्यतो नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.
11) नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची मात्रा युरिया, डायअमोनिअम फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश या खतांपासून तयार केलेल्या ब्रिकेटच्या माध्यमातून वाफसा स्थिती असताना पहारीने भोके घेऊन मुळांच्या सान्निध्यात दिल्यास रासायनिक खताची कार्यक्षमता चांगलीच वाढते.
12) ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीत युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ठिबक सिंचनाद्वारे सात ते आठ महिन्यांपर्यंत 12 ते 13 हप्त्यांत पिकाच्या गरजेप्रमाणे विभागून दिल्यास 30 टक्के खतमात्रेत बचत होऊन 10 ते 15 टक्के उत्पादनातही वाढ होते. ठिबक सिंचनाद्वारे दिलेली खते मुळांच्या सान्निध्यात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार गरजेप्रमाणे देता येतात आणि निचऱ्याद्वारे होणारे अन्नद्रव्यांचे नुकसान टाळता येते.
सेंद्रिय खत व्यवस्थापन
पहिली फणपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किवा कंपोस्ट खत पसरून टाकावे. ते रोटाव्हेटरच्या साह्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर ऊस लागवडीआधी एकरी उर्वरित ५ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता सरीमध्ये मातीत मिसळावा.
सेंद्रिय खतामुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. निचरा सुधारतो. जिवाणूंची वाढ होते. रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. शेणखत किवा कंपोस्टखत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडीखत, बायोकंपोस्ट, उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात.
रासायनिक खतांचा वापर
अडसाली हंगामातील उसाचे उत्पादन जास्त असल्यामुळे अन्नद्रव्यांची गरजही जास्त असते. अडसाली ऊस पिकास ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद व १७० किलो पालाश प्रति हेक्टरी वापरण्याची शिफारस आहे. माती परीक्षण करून, त्यातील जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण जाणून तज्ज्ञांच्या साह्याने रासायनिक खतांची मात्रा ठरवावी.
शिफारशीत खत मात्रा देते वेळी नत्र चार हप्त्यांत विभागून द्यावा. जमीन हलकी असल्यास नत्र ५ ते ६ वेळा विभागून द्यावा. उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज फार कमी असते. त्यामुळे १० टक्के नत्र लागवडीपूर्वी उगवणीसाठी, मुळांच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी द्यावा. लागवडीवेळी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के देणे फायदेशीर ठरते.
फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्राची गरज असते. लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्राचा ४० टक्के दुसरा हप्ता व १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्राचा १० टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा.
उसाच्या जोमदार वाढीच्या वेळी सर्व अन्न घटक जास्त प्रमाणात शोषले जातात. मोठ्या बांधणीच्या वेळेस नत्राचा शेवटचा ४० टक्के हप्ता, स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के दुसरा हप्ता देणे आवश्यक आहे.
लागवडीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत.
चला एकत्र शिकू या, ही माहिती तुमच्या शेजाऱ्यांशी शेअर करण्यात मदत करा. अग्रोभूमिला आधार द्या कारण हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बनवले आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया अग्रोभूमि वर साइन अप करा ! आपल्या संपर्क पृष्ठाच्या माध्यमातून आम्हाला संदेश पाठवू शकता.